*विश्व पर्यावरण
🍂 *मनातल्या मनातले* 🍂
४ जून २०२०
*विश्व पर्यावरण*
वसुंधरा विधात्याने निर्माण केलेलं सुंदर स्वप्न .
हे वसुंधरे !
अनमोल रत्नांची खाण तू आम्हाला दिली. हिरव्या रंगाचा शेला ओढलेलं तुझं रुप सगळ्यांना मोहून टाकणारं आहे . फुलांनी बहरलेली , फळांनी लगडलेली , शेतांनी लहरलेली वसुंधरा म्हणजे आपल्या लेकरांच्या भरण पोषणा साठी सज्ज असलेली माताच आहे. युगानुयुगे एकाच कक्षात स्वतः भोवती फिरत राहून तेजाचा , प्रकाशाचा स्त्रोत मानवाला उपब्ध करुन दिलास.
सृष्टीचा समतोल राखण्यासाठी, वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी , मानवाच्या कल्याणासाठी पशुपक्षी ,जीवजंतू निर्माण केलेस . त्यांच्या सुरक्षेची तजवीज केलीस . पर्यावरणाचे कवच दिलेस.
माते ! आपल्या अपत्यांना कशाचीही उणीव भासू नये म्हणून किती काळजी घेतेस तू ? शितल वायू, निर्मळ जल, वनांनी , खनिजांनी समृद्ध असलेल्या वसुंधरेनी मुक्त हस्तानी आपली संपत्ती मानवावर उधळली. आणि आम्ही काय केलं गं ? तुला ओरबाडलं , प्रदूषित केलं , रसायनांच्या भरमार वापराने तुझ्या मातीचा कस नाहीसा केला , वनं नष्ट केली . दुर्मिळ गुणकारी वनस्पतींचा नाश केला. आमच्या रसनेचे चोचले पुरवण्यासाठी पशुपक्ष्यांच्या जीवावर उठलो. जैवविविधता नष्ट केली. तुला नामशेष करण्याच्या स्थितित आणून सोडलं
वसुंधरे ! तू पण स्त्रीच आहेस म्हणून तुला असे अत्याचार सहन करावे लागताहेत कां गं ? पण शेवटी स्त्री शक्तीचा परिचय तू देतेसच . अत्याचार सहन न झाल्याने चवताळून उठलेली स्त्री सुद्धा रौद्र रुप धारण करते. तशीच तू कोपलीस का गं मानवावर ? घाण्याला जुंपल्याप्रमाणे एकसारखे फिरत राहण्याचे नाकारुन कड बदलते आहेस का तू ?
सतत येणारी वादळं , भू स्खलन, धरणीकंप तुझं रौद्र रुप दाखवून देतात. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीनी जगापुढे अनेक समस्या निर्माण करतेस . आईनी पाठ फिरवल्यावर लेकरु सैरभैर होतं तशी आमची अवस्था झाली आहे.
आता तर कोरोनाच्या रुपानी मानवानीच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला मग तू तरी क्षमा कशी करणार ? प्रलय असाच असतो का गं ? का ही प्रलयाची सुरुवात आहे ? या प्रलयातून वाचणार का कोणी ? तुला शुद्ध करण्याची, पूर्वीचे स्वरुप आणण्याची ही तुझीच योजना आहे का ?
कोरोनाचे संकट आल्यावर तू दिलेल्या औषधी वनस्पतींची आम्हाला आठवण आली . तुझ्या अनमोल देणगीला एरवी आम्ही मोडीतच टाकून दिलं होतं.
आता पर्यावरण थोड्याप्रमाणात का होईना पूर्वीचं रुप धारण करायला लागलं आहे. पुन्हा स्वच्छ निळे दिसणारे आकाश , पक्ष्यांची किलबिल, व निर्धास्तपणे विहरणारे पशुपक्षी , दूरवरुन होणारे हिमालयाचे दर्शन आम्ही तुझ्यावर किती अत्याचार केले होते याची साक्ष देतात. कबूल आहे संहाराच्या खुणा तुझ्यावर कायम रहाणारच आहेत. त्या मानवाला त्याच्या चुकांची जाणीव सतत करुन देणारच !
हे वसुंधरे ! अशी कोपू नकोस. तूच रागवलीस तर लेकरांनी जायचं कुठे ?
आई आपल्या मुलांचे कान धरुन शिक्षा करुन त्यांना वठणीवर आणते . तशीच सुबुद्धी आम्हाला दे. पण तुझ्या कृपेची छाया आम्हावर सतत राहू दे. या पुढे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
हे वसुंधरे ! तुला शत शत प्रणाम.
*सौ .अमृता खोलकुटे* .©
Comments
Post a Comment