शब्दसंपदा

🍁मनातल्या मनातले 🍁
25Nov'2018

       शब्दसंपदा 

आजकाल इंग्रजी मिश्रित मराठी बोलण्याची पद्धतच आली आहे. आपली भाषा किती सुंदर आहे .अनेक अलंकारांनी ,शब्दसंपदेनी नटलेली भाषा आजकाल एखाद्या कार्यक्रमाच्या निवेदनातच कानावर पडते.
   इतर अलंकारां बरोबरच म्हणी आणि वाक् प्रचार भाषेला समृद्ध करतात. भाषेचं सौंदर्य अलंकारानी खुलतं.
 पूर्वी सहज बोलतांना आई  ,आजी म्हणींचा वापर करत  असत.
  माझ्या सासुबाईंना बोलतांना म्हणी वापरायची खूप सवय होती. त्यांच्या काही म्हणी जरा हटके असायच्या.
उन्हाळा -दिवाळीत आम्ही सगळे एकत्र जमायचो.  दुपारची जेवणं आटोपून सगळं आवरुन आम्ही चारही जावा एका कोप-यात खुसखुसत बसायचो . मुलं भूकभूक करत यायची .त्यांना  दटावून पिटाळून लावायचो. मुलांना काय आजी आहेच. आई आम्हाला हाक मारायच्या . आम्हाला कुठलं ऐकू येतयं? मग घरात येऊन कानोसा घ्यायच्या आणि मोठ्यानी म्हणायच्या
 "घरी चार सुना अन् पाणी मागू कुणा?"
आम्ही धडपडत उठायचो.
कधी रात्रीच्या जेवणाचा सुटसुटीत बेत केला की तो आमच्या मुलांनी किंवा सासुबाईंच्या मुलांनी हाणून पाडलाच म्हणून समजा. त्यांना खास आवडीचा पदार्थ हवा असायचा . कंटाळा केला की आई स्वतः  उठायच्या. म्हणायच्या
 " तरण्या झाल्या बरण्या म्हाता-या झाल्या हरण्या.
    घरात पाहुणे असायचे सारखे .मग मागच्या दारानी पिशवी घेऊन बाजारात पाठवणं आलंच ! मग म्हणायच्या "एकावेळी का नाही सांगत आणायला? घे पिशवी जा  बाजारात."
 " एकानी एकानी अन् बुवा माझा दुकानी."
 उन्हाळ्यात सगळे अंगणात नाहीतर गच्चीवर जायचे झोपायला.  नंतर आम्हा जावांची पंगत  बसायची. कधीतरी एखादा छानसा पुरवठ्याचा पदार्थ,गरम भात  असं काहीतरी सुरु असायचं तो आई काय चाललयं याचा अंदाज घ्यायच्या गॕसवर भांडं  दिसलं की म्हणायच्या काय चाललयं  गं एवढ्या रात्री ?
 "सारा गाव निजे चिपडीचं वरण   शिजे "
कधी कुठून बाहेरुन आलो की काहीतरी गोंधळ,पसारा दिसायचा. चिडचिड व्हायची. जरा कुठे बाहेर जावं तर काही चैन नाही जिवाला. जरा जोरातच विचारायचं  "कोणी केलं? "आई तोंडाला पदर लावून हसत म्हणायच्या म्हणायच्या "कोण करणार?
 " जे गुण बाळे ते गुण लेकुरवाळे."
हा पसारा बाबांचा असायचा . आम्ही चौघी हसू दाबत,जीभ चावत आत पसार व्हायचो.
माझ्या मोठ्या दिरांना सगळ्या गावाची कामं अंगावर घ्यायची मोठी हौस. बाबा तेंव्हा मुंबईला होते. मग काय दर उन्हाळ्यात  त्यांच्याबरोबर  कोणीतरी नोकरी शोधायला मुंबईला यायचाच.  तो किती जवळचा आहे याचे साग्रसंगीत वर्णन व्हायचे. मुक्काम आमच्याचकडे. आईंची कुरकुर चालायची.

 "कोणाचे कोण पितळेचे होन"

एखादा दूरदूरचे नाते सांगत आला की

  "विटेस गोटा मावसभाऊ".

सहज बोलता बोलता  " कशात काय अन् फाटक्यात पाय, बाबा गेला आणि दशम्याही , लंगडं ते लंगडं गाव घरी चरेना, ...........पावाट्याचं निमित्त ,घरची म्हणते देवा देवा ,अशा कितीतरी म्हणी त्या वापरायच्या.
 त्यांच्यामुळे मलाही बोलतांना म्हणी वापरायची सवय लागली.  माझ्या एक सहकारी होत्या त्यांना काम नको पुढेपुढे करायची सवय  , अगदी

"मला पहा आणि फुलं वहा "

काॕलेज मध्ये खेड्यातून बरीच मुलं यायची त्यांचं म्हणजे
   "वेष बावळा परी अंतरी नाना कळा "
असा प्रकार.
 *"वेडा होऊन पेढा खाणं "
 म्हणजे काय हे त्यांच्याकडून मला चांगलच समजलं.

मी म्हणी वापरल्या की विद्यार्थी ,सहकारी गोंधळल्या सारखे माझ्याकडे बघायचे."काय म्हणतात या ?" प्रत्येक वेळी अर्थ उलगडून सांगायचा म्हणजे मजाच गेली. माझाच विरस व्हायचा.
   आजच्या पिढीला मराठी भाषाच यायची मारामार तर म्हणी कुठून येणार ? म्हणी आणि वाक् प्रचारांशी परीक्षेतल्या "वाक्यात उपयोग करा "या प्रश्ना पुरताच त्यांचा  संबंध .
सगळी सरमिसळ भाषा. मध्येच हिंदी , मध्येच इंग्रजी

   *"एक ना धड भाराभार चिंध्या "

आपल्या भाषेचे जतन होणार तरी कसे? फक्त साहित्य संमेलनांपुरतेच उरणार की काय ?
गंभीर पणे विचार करायला हवा.
तरुण मंडळींनी  मराठी बोलायला सुरवात करावी मग बघा भाषेचं सौंदर्य कसं उलगडत जातं ते !

@  सौ.अमृता खोलकुटे

Comments

Popular posts from this blog

"कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन*"

*विश्व पर्यावरण

आनंदाचे झाड .....